। नेरळ । प्रतिनिधी ।
सध्या सुरू असलेली लग्न सराई आणि लग्न तिथी गाठण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यात लग्न सोहळे डामडौलात साजरे करण्याची प्रथा सर्वत्र दिसून येत असताना अवकाळी पावसाने लग्न सोहळ्यासाठी उभारले जाणार्या मंडपांचे लाखोंचे नुकसान केले आहे. त्याचबरोबर लग्न सोहळ्याची गणिते देखील बिघडली आहेत.
कर्जत तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वैशाख महिना सुरू असून सध्या सर्वत्र लगीनघाई दिसून येत आहे. वादळी वार्यासह अवकाळी पाऊस येत असल्याने सध्या सुरू असलेल्या लग्न सराईत मोठे विघ्न येत आहे. गरीब असो की श्रीमंत त्यांच्यात लग्न सोहळ्यातील सजावटीवर लाखोंचा खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु, अवकाळी पावसाने लग्न सोहळे आयोजित करणार्यांचे आणि मंडप डेकोरेटर यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मंडपासाठी वापरले जाणारे कापड पाण्यात भिजून गेले आहे. तर, काही ठिकाणी हे मंडप वादळी वार्याने उडून नेले आहेत. त्यामुळे मंडप डेकोरेटर मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत.