| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षे उरणकर रेल्वे कधी सुरू होणार आहे याची वाट होते, हे लवकरच म्हणजे मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी चाचपणी करण्यात आली आहे.
उरणपर्यंत रेल्वे येण्यासाठीची सुरक्षा तपासणी मध्य रेल्वेचे सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा यांनी केल्याची माहिती मिळत आहे. ते नवघर गावाजवळील न्हावा शेवा रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वेच्या सेफ्टी वॅगनच्या माध्यमाने येऊन गेले. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. सोमवारी पुन्हा एकदा संपूर्ण मार्गाची सुरक्षा पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सुरक्षे बाबतचा अहवाल वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे. मग पीएमओ कार्यालयाकडून प्रत्यक्ष उद्घाटनाची तारीख मिळाल्यावरच या ठिकाणी प्रत्यक्ष लोकल रेल्वे असल्याची माहिती एका अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
उरणला चाचणीसाठीची लोकल ट्रेन धावण्याचे वेळापत्रक काल जाहीर झाले होते. त्यानुसार सकाळ पासूनच उरण मधील नागरीक चाचणीची ट्रेन येऊन गेली का असे विचारत होते. काही अति उत्साही नागरीक तर थेट रेल्वे स्टेशनवरच खरोखर ट्रेन आलीय का ते बघायला गेले होते. मात्र तेथील अधिकारी वर्गाने आज केवळ चाचणीची एका डब्याची येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. उरण रेल्वे स्टेशन परिसरात तीन इंजिनांचे डब्बे मागील काही दिवसांपासून ट्रायलसाठी फिरविण्यात येत आहेत. ते वेगवेगळ्या ट्रॅकवर वेगवेगळ्या पद्धतीने चालवूनही पाहिले जात असल्याचे दिसून आले.
सोमवारी वरिष्ठ अधिकारी वर्गाची टीम या ठिकाणी देण्याची शक्यता असल्याने उरण स्टेशनच्या सफाईच्या कामाला वेग देण्यात आला आहे. अनेक मजुर लावून हे स्टेशन चकाचक करण्यासाठी अधिकारी वर्ग झटत असल्याचे आज दिसून आले आहे. 135 कोटी रुपये खर्च करून उरण रेल्वे स्टेशनची उभारणी करण्यात आली असून अजूनही बरेच काम बाकी आहे त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात काम असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईतील के डी कन्स्ट्रक्शन नामक कंपनी उरण रेल्वे स्थानक उभारणीचे काम करीत आहे. अजूनही फलाटावर पंखे, बसण्यास बाकडे आदी बसविण्याचे राहिले असून ते काम ही पुढील दहा पंधरा दिवसात होईल. मात्र प्रत्यक्ष रेल्वे इथपर्यंत सुरू होण्यासाठी पीएमओ कार्यालयाची मंजुरी लागणार असून ती मिळाली प्रत्यक्ष उद्घाटनाचा बार उडेल अशी माहिती एका अधिकार्याने दिली आहे.
आज मात्र केवळ न्हावा शेवा म्हणजेच नवघर गावापर्यंतच्या रेल्वे स्टेशन परिसरात उपरोक्त अधिकारी येऊन त्यांनी खाराकोपर ते न्हावा शेवा या मार्गाची सेफ्टी चाचणी केली आहे. मात्र त्यात काय त्रुटी मिळाल्या किंवा सेफ्टी चाचणीत हा मार्ग उत्तीर्ण झाला आहे, माहिती मिळू शकली नाही.