| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील ममदापुरवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी (20) मोर्चा काढला. हिरु निरगुडे, दशरथ निरगुडे, ग्रामपंचायत माजी सदस्य राजू झुगरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी महिला डोक्यावर हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्या सर्व प्रवासात रखरखत्या आणि रणरणत उन्हाचा परिणाम होईल याची कोणतीही काळजी न करता आदिवासी ग्रामस्थ ग्रामपन्चायत कार्यालयाबाहेर पोहचले.
ग्रामपंचायत कार्यलयाबाहेर मोर्चेकरी ग्रामस्थांची घोषणाबाजी सुरु असताना ग्रामपंचायत कार्यलयात चार मोर्चेकरी यांनी यावे अशी सूचना करण्यात आली, मात्र ग्रामपंचायत कार्यालयात बसलेली सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी सदसय यांनी बाहेर यावे आणि चर्च आकारण्याची मागणी मोर्चेकरी यांनी केली. त्यानंतर सरपंच दामा निरगुडा, उपसरपंच नंदिनी शिनारे तसेच सदस्य भिकाजी निर्गुडा, अनिकेत गायकवाड, जुबेर पालटे, कल्पना डांगरे, चंद्रकांत शिनारे यांनी कार्यलयाबाहेर बाहेर येऊन मोर्चेकरी यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यावेळी काही विषयांवर मोर्चेकरी आणि ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली. शेवटी महिन्याभरात सर्व उर्वरित कामे पूर्ण करून ममदापुर वाडी पर्यंत पाणी पोहचवले जाईल असे आश्वासन देण्यात आले.
महिनाभरात पाणीपुरवठा सुरु झाला नाही तर सर्व आदिवासी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यलयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामपंचायतला मोर्चेकरी यांच्या वतीने हिरु निरगुडे यांच्याकडून देण्यात आला. मोर्चामध्ये कमळू निरगुडे, गणेश निरगुडा, अनंत पारधी, चंद्रकांत निरगुडा, सुरेखा निरगुडा, बेबी दरवडा, आशा पारधी, मंजुळा पारधी, अंदाजानं पारधी, प्रमींना निरगुडे, लक्ष्मी निरगुडे, विजया झुगार यांच्यासह आदिवासी तरुण सहभागी झाले होते.