अटक टाळण्यासाठी वायकरांनी स्वीकारली उमेदवारी- गजानन कीर्तीकर


। मुंबई । प्रतिनिधी ।

ईडीची चौकशी सुरू झाल्यामुळे पक्ष बदलला, असे रवींद्र वायकर यांनी स्वत:च मुलाखतीतून सांगितले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात ई-समरी द्या, मग उमेदवारी घेईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांची अटक टळली आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचाही टांगती तलवार टळली, असा दावा गजानन कीर्तीकर यांनी केला आहे.

महायुतीसोबत असणार्‍या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे. दरम्यान, निवडणुकीत सर्वच उमेदवार तुल्यबळ असतात. मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघातही यंदा काँटे की टक्कर होत आहे. त्यामुळे नक्की कोण जिंकणार, हे आज सांगता येणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळे मला जमेल तेवढा प्रचार रवींद्र वायकर यांचा केला आहे. मी मतदानही रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाला दिलं, असंही गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे. गजानन कीर्तीकर यांनी आज मतदानानंतर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारभावरही टीका केली आहे. ईडीबद्दल आता लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि लोक ही नाराजी व्यक्तही करू लागले आहेत. ईडीबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या वरिष्ठांच्याही लक्षात आली असून पुढील काळात ते या कारवाया कमी करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version