हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
| उरण | वार्ताहर |
हवामान विभागाने समुद्रात खराब हवामान व अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे. त्यासाठी जलवाहतुकीला इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. त्यामुळे उरणमधील जलसेवा मागील सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना बसला आहे. प्रवाशांना रस्ते मार्गाने लांबचा व वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. उरणमधील जलसेवा बुधवारपासून (19 जुलै) बंद आहे. तर वातावरण बदल होऊ लागला असून कदाचित सोमवार सायंकाळपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता बंदर विभागाकडून व्यक्त केली जात आहे. उरण येथून मोरा, जेएनपीटी व करंजा या तीन बंदरातून ही सेवा आहे. यामध्ये मोरा ते मुंबई, जेएनपीटी ते मुंबई व करंजा ते रेवस (अलिबाग) या जलमार्गाने पावसाळ्यात जलसेवा सुरू असते. अतिवृष्टी व खराब हवामानामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे हवामान विभागाने धोक्याच्या इशारा दिल्याने मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) ही जलसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.