पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन
| पनवेल | वार्ताहर |
शहरातील ओनजीसी कॉलनीच्या समोर जुना मुंबई-पुणे मार्गालगत असलेली जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम एमजीपीकडून केले जात आहे. यासाठी बारा तासाचा शटडाऊन घेण्यात आल्यामुळे नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, काळुंद्रे, करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे,उसली, बेलवली, बारदोली,नांदगाव, कुडावे या वसाहतींसह गावांमध्ये पुढील तीन दिवस पाणींटचाईच्या संकटाचे असणार आहेत.
पनवेल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने एमजीपीकडून जलवाहिनी दुरुस्तीची कामे घेतली जात आहे. जुना मुंबई-पुणे मार्गावरील ओनजीसी कॉलनीच्या समोर अनेक दिवसांपासून गळती होत असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.30) बारा तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. तसेच, पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पुढील तीन दिवस पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमजीपीने केले आहे.
पनवेल आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी एमजीपीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. वारंवार जलवाहिनी फुटीमुळे संबंधित विभाग हतबल झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याबद्दल पनवेलकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पनवेलसह वसाहतींना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून बदलण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे काम सुरू असतानाच जलवाहिनीला गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
के. बी.पाटील, उप-विभागीय अभियंता, एमजीपी
पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. तसेच, शटडाऊन कालावधीत जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवावे. जेणेकरून या कालावधीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होणार नाही.