जलजीवन अंतर्गत पाणीयोजना कार्यान्वित; चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचयतील वाणदे या गावी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतील घरोघरी नळ योजनेचा भूमीपूजन समारंभ शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील आणि जि.प. माजी सदस्या नम्रता कासार यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, सुमारे 54 लाख खर्चाची ही योजना असून, वाणदे गावासाठी या योजनेचा घरोघरी लाभ मिळणार आहे. वाणदे गावातील समस्त ग्रामस्थांची घरोघरी पाणीपुरवठ्याची मागणी आता पूर्ण होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरणार आहे. वाणदे ग्रामस्थ, तरुण सुरुवातीपासून आतापर्यंत कायम शेतकरी कामगार पक्षावर विश्वास ठेवून पाठीमागे भक्कम उभे राहिलेले आहेत. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा, आमचा ग्रामस्थांसाठी मदतीचा हात कायम राहील, असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी वाणदे ग्रामस्थांना बोलताना दिला.
माजी आमदार पंडित पाटील म्हणाले की, वाणदे गाव 40 ते 50 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाबरोबर असल्याने येथे अनेक विकासकामे आम्ही मार्गी लावलेली आहेत. या गावात पाणी, रस्ते, समाज मंदिर, शाळा, अंगणवाडी, हायस्कूल अशी विकासकामे आम्ही पूर्णत्वास नेऊन सामाजिक कामे वेगाने मार्गी लावून ग्रामीण भागाचा विकास साधला आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून वाणदे येथे सामाजिक सभागृह, हनुमान मंदिराचे काम वेगाने होत असून, पूर्ण होत आले आहे. ग्रामस्थांनी आमच्या पक्षावर असेच प्रेम दाखवून कायम पाठीशी उभे राहावे, आपल्या विश्वासला तडा जाणार नाही, असे आवाहन पंडित पाटील यांनी केले.
नऊ गाव आगरी समाजाचे अध्यक्ष तथा वाणदे हायस्कूलचे चेअरमन शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत शेकाप आणि पाटील परिवाराने गावाचा विकास केला आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील, स्वर्गीय दत्ता पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, अॅड. आस्वाद पाटील, मनोज भगत, अजित कासार, नम्रता कासार आदींच्या सहकार्यानेदेखील विकासकामात मोठा सहभाग आहे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ शेकापबरोबरच आहोत आणि राहू, असा विश्वास तुकाराम पाटील यांनी व्यक्त
शेकाप जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरूड तालुका चिटणीस अजित कासार यांनीदेखील मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. याप्रसंगी विक्रांत वार्डे अध्यक्ष पुरोगामी युवक आघाडी, मनोज भगत, अजित कासार, अमोल मिठाग्री, अल्पसंख्याक अध्यक्ष राहील कडू, सरपंच हाफीज कबले, जनार्दन मांदाडकर, स्वाती वारगे, अमोल पाटील, नंदकुमार पाटील, रामचंद्र दिवेकर, रमेश दिवेकर, श्रीकांत वारगे, दिवेकर, अशोक नाक्ती, चंद्रकांत बेडेकर, कलावती पाटील, धर्मा हिरवे, अनंता ठाकूर आणि असंख्य ग्रामस्थ, पंचमंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले.