शरद पवारांची ममता बॅनर्जींसमवेत प्रदीर्घ चर्चा
मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय भाजपला आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपविरोधी असलेल्या कोणालाही एकत्र यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. आमच्यासाठी नेतृत्व हा मुद्दा नसून सक्षम पर्याय उभा करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. ज्यांची मेहनत करायची तयारी आहे, सर्वांसोबत काम करायची तयारी आहे त्यांना आघाडीमध्ये सोबत घेऊन जायचं आहेफफ, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत पवारांनी बुधवारी सिल्व्हर ओक यान निवासस्थानी चर्चा केली.त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बॅनर्जी माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला की, शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यामुळं तुम्हाला असं वाटतं का की शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं? या पत्रकारांच्या प्रश्नावर काहीशा संतापलेल्या स्वरात ममता म्हणाल्या, अरे तुम्ही युपीएची काय भाषा करता, आता युपीए राहिलेली नाही. आता फक्त हे जाहीर करायचं बाकी राहिलंय
काँग्रेसला विरोध
ममता बॅनर्जी भाजपविरोधातील आघाडीमधून काँग्रेसला वगळण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ममतांनी राहुल गांधींवर देखील टीका केली होती. त्यामुळे तिसर्या आघाडीमध्ये काँग्रेसला घेणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. विदेशात राहून राजकारण कसं होईल? असं ममता बॅनर्जी राहुल गांधींवर टीका करताना म्हणाल्या होत्या. तसेच त्यांची काँग्रेसविरोधी देखील भूमिका दिसली.
ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे पण हे कोणा एकट्याचं काम नाही. जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा. कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार?
ममता बॅनर्जी,मुख्यमंत्री,प.बंगाल
आज राष्ट्रीय पातळीवर सारखे विचार असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे. सर्वांनी मिळून भाजपला सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येत्या 2024 च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय तयार व्हायला हवा. त्यासाठीच आज ममता बॅनर्जीसोबत चर्चा केली.
शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष