। अलिबाग । भारत रांजणकर ।
मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहिर केले जातील. मात्र रायगडमध्ये ज्या पालकमंत्री पदावरुन रामायण घडले ते पालकमंत्रीपद मिळविण्याची धडपड करणारे बंडखोर आमदार भरत गोगावले यांचा समावेश मंत्रीमंडळात न झाल्याने आता हे पद कोणाकडे जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच राज्यात 35 जिल्हे असताना मंत्री मात्र 18 त्यामुळे सर्वच जिल्ह्यांना एकच पालकमंत्री न मिळता एकेका मंत्र्यांकडे दोन दोन जिल्ह्यांचे भार दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान कोणाकडे जातो, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर रायगड जिल्ह्यात ज्यांच्यातून विस्तवही जात नव्हता, त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना हातात हात घालून काम करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे सुरुवातीपासून कुरबूरींना सुरुवात झाली. तीन आमदार असल्याने शिवसेनेच्या आमदारांना आपल्यालाच मंत्रीपद मिळेल, याची खात्री होती. त्यामुळे एकमेव आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळाल्याने सगळयांनी आगपाखड करत मातोश्रीपर्यंत नाराजी पोहचवली. मात्र पक्षश्रेष्ठींनी शांत राहून आघाडीधर्म पाळण्याचाच सल्ला दिल्याने शांत राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर निदान पालकमंत्री तरी शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा धरुन बसलेल्या तीनही आमदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरत पुन्हा पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांनाच बहाल करण्यात आले.
पुन्हा नाराजी नाटय झाले आणि त्यांना शांत देखील केले. पण नाराजीचा निखारा जळतच होता. त्यालाच हवा देत राज्यात बंडखोरीचे राजकीय नाटय झाले. त्यातूनच सत्तांतर होत बंडखोरांच्या नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळाले. त्यामुळे आता भरत गोगावले यांच्या रुपाने मंत्रीपदाला गवसणी मिळालीच असा समज तीनही आमदार आणि त्यांच्या समर्थकांचा झाला असतानाच मंत्रीमंडळ विस्तारातून त्यांचे नाव गायब झाले. त्यामुळे साहजिकच ठामपणे दावा केले जाणारे पालकमंत्रीपद देखील दीवा स्वप्नच ठरले.
परिणामी, आता ज्यावरुन सर्व नाटय घडले ते रायगडचे पालकमंत्री पद कोणाकडे जाते, याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबईजवळचे असल्याने सर्व नाडया हातात असाव्यात यासाठी दोन्ही पक्ष आपली ताकद लावतील, असा अंदाज आहे. त्यात राज्यात 35 जिल्हे असताना मंत्री मात्र 18 असल्यामुळे एकेका मंत्र्यांकडे दोन दोन जिल्ह्यांचे भार दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या गोटातून यापूर्वी पालकमंत्री पद भुषविलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या हाती पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकत्व सोपविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यांच्याकडे देखील दोन जिल्ह्यांचा पदभार येणार असल्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान कोणाकडे जातो, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.