बागायतदार, नर्सरी धरकांमध्ये टोलवाटोलवी
। अलिबाग ।भारत रांजणकर ।
कोकणातील शेतकर्यांवर निसर्ग आणि पाठोपाठ आलेल्या त्यौक्ती चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागा उध्वस्त होऊन बागायतदार भुईसपाट झाला होता. त्यावेळी राज्य सरकारने या बागायतदारांसाठी फळबागा लागवड योजनेचा लाभ जाहिर करीत रोपे देण्याचे जाहिर केले. त्यानुसार रोपांचे वाटप देखील झाले. मात्र आता दोन वर्ष होत आल्यावर या बागायतदारांना देण्यात आलेल्या नर्सरीधारकांना रोपांचे पैसे देण्यास सांगण्यात आले. काही बागायतदारांनी त्यानुसार पैसे दिले देखील त्यामुळे बागायतदार आणि नर्सरीधारक हैराण झाले आहेत. दरम्यान, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधला असता कृषी विभागाकडून रोपांसाठी 26 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र दोन वर्षे होऊन गेल्यावर देखील हा निधी वितरीतच झाला नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
3 जून 2020 रोजी कोकणात निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सर्वाधिक नुकसान रायगड जिल्ह्यात झाले. तब्बल 11 हजार हेक्टर बागायत क्षेत्र बाधीत झाले. शंभर शंभर वर्षे जुनी बाजती नारळ सुपारी सारखी झाडे उत्मळून पडली. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी बागायतदारांना दहा पंधरा वर्षे लागतील. या संकटातून उभे राहण्यासाठी सरकारने शेतकर्यांसाठी फळबाग लागवड योजनेतून रोपे देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला. तसेच बागा साफ करण्यासाठी देखील रोजगार हमी योजनेतून निधी देण्याचे देखील जाहीर केले. त्यानुसार कृषी विभागाने रायगड जिल्ह्यातील बागायतदारांना रोपे देण्यास सुरुवात देखील केली. मात्र सुपारीची रोपे कृषी खात्याकडे उपलब्ध नव्हती तर मोजक्याच नर्सरीमध्ये उपलब्ध होती. त्यामुळे संबंधीत नर्सरीमधून रोपे घेण्याच्या सुचना कृषी विभागाने दिल्या. त्यानुसार रोपे घेऊन त्यांची लागवड देखील करण्यात आली. बागायतदारांनी देखील पुन्हा नव्याने उभे राहण्याच्या दृष्टीने या रोपांची नव्याने लागवड करण्यास सुरुवात केली. आज ही लागवड होऊन वर्षे दीड वर्षे देखील झाली. आपले दुःख नुकसान विसरण्याची तयारी करीत असतानाच कृषी विभागाकडून रोपांचे पैसे ना बागायतदारांना देण्यात आले ना नर्सरी चालकांना. त्यामुळे बागायतदार आणि नर्सरी चालक यांच्यासमोर पैसे कुठे मागायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. कृषी विभागाने देखील बागायतदारांना सदर रोपांचे पैसे नर्सरी चालकांना अदा करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार बागायतदारांच्या हातात खाजगी नर्सरींमधून घेतलेल्या रोपांचे बील हाती पडली. या बिलांमुळे बागायतदार हैराण झाले आहेत. काहीजणांनी पैसे अदा देखील केले. तर अनेकजणांचे पैसे बाकी असल्यामुळे नर्सरीचालक देखील हैराण झाले आहेत.
आम्ही कृषी विभागाच्या सुचनेनुसार नर्सरीमधून रोपे घेतली मात्र त्याचे पैसे जमा झालेले नसल्याने कृषी विभागाने नर्सरीला पैसे अदा करण्याची केलेल्या सुचनेनुसार पैसे दिले आहेत. मात्र अजूनही पैसे आमच्या खात्यात जमा झालेले नाही. तसेच आमचे नारळ, सुपारी, आंबा, असे अनेक फळझाडांचे नुकसान झालेले असताना रोपे मात्र फक्त सुपारीचीच देण्यात आली आहेत.
सागर नाईक, चौल
बागायतदारांना कृषी विभागाच्या सुचनेनुसार रोेपे दिली. मात्र शासनाकडून अजूनही निधी आला नसल्याने सदर रोपांचे सुमारे 12 ते 13 लाख रुपये आम्हाला येणे आहेत. 10 टक्के बागायतदारांनी पैसे अदा केले. त्यामुळे उर्वरित पैशांसाठी सदर निधीच्या आम्ही देखील प्रतिक्षेत आहोत.
हेमंत पाटील, नर्सरी चालक