। नेरळ । वार्ताहर ।
ममदापुर ग्रामपंचायत मधील गैरव्यवहाराबाबत स्थानिक ग्रामस्थ सचिन अभंगे गेली वर्षभर आवाज उठवत आहेत. मात्र कर्जत पंचायत समितीने नेमलेल्या चौकशी समितीकडून ग्रामपन्चायत मधील सत्ताधार्यांना पाठीशी घातले जात आहे. दरम्यान,या गैरव्यवहार प्रकरणी न्याय मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय अभंगे यांनी घेतला आहे. यांच्या तक्रारीनंतर ममदापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे कर्जत पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी उज्वला जाधव यांनी चौकशी पूर्ण केली आहे. सदर चौकशीत 21 प्रकारची स्वयंपाकी व जेवणावळी साहित्य, 200 खुर्च्या, 50 केटरिंग टेबल खरेदी, खरेदी केलेले जीएस सीएसटी बिल, दुकानदाराने दिलेल्या पावत्या, डेडस्टॉक रजिस्टर, साठा नोंदवही, वस्तूंची पोहोच आणि वाटप या सर्व बाबी कागदोपत्री अनियमित असताना देखील विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत दप्तर योग्य असल्याचे नमूद केले आहे.
कागदावर वस्तू खरेदी केल्याचे दर्शविले असून प्रत्यक्षात मात्र किती आणि कोणत्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, याची खातरजमा न करता सदर वस्तू खरेदी झाल्याचे विस्तार अधिकारी यांनी नमूद केलेले आहे. ग्रामपंचायतीने सदर वस्तू दलित वस्तीतील ज्या सभागृहात ठेवलेल्या आहेत तेथे जाऊन खरोखरच 21 प्रकारच्या वस्तू मोजून पाहिल्या का? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने काही मर्जीतील नागरिकांच्या सह्या घेऊन काही बोगस मंडळांना ताबा दिल्याचे म्हटले आहे,परंतु त्या वस्तू आजही जागेवर मिळत नाहीत, त्यामुळे तक्रारदार सचिन अभंगे हे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहेत.