जेट्टीखालील पिलर लोखंडी सळ्या निघाल्याने निकामी
| सोगाव | अब्दुल सोगावकर |
गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने जोडणाऱ्या या मार्गावरील मांडवा जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. जेट्टीवरील पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडल्यामुळे लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. मात्र, संबंधित महाराष्ट्र सागरी मंडळाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटक व प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेटवे-मुंबई व मांडवा-अलिबाग या जलमार्गावर गेल्या काही वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे मांडवा येथे नवीन जेट्टी उभारण्यात आली होती. मात्र, काही वर्षातच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या जेट्टीवरील पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी खांबांच्या सळ्या बाहेर आल्या आहेत. सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जलमार्गावर पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव 25 मे ते 30 ऑगस्टपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद केली जाते. मात्र, आता 1 सप्टेंबरपासून ही प्रवासी वाहतूक (वादळवारा वगळता) पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या व मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रथम पसंती असलेल्या अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनकडे येणारे पर्यटक वेळेची व इंधनाची बचत तसेच आरामदायी प्रवास असल्यामुळे या मार्गाने हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक व इतर सर्व प्रवासी प्रवास करतात. जेट्टीवरील खांब निकृष्ट झाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा व इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
जेट्टीवरील लोखंडी पत्रे पडण्याची भीती
जेट्टीवरील ठिकाणी असणाऱ्या पत्र्याच्या शेडवरील लोखंडीपत्रे गंजल्यामुळे काढण्यात आले आहेत, तर काही प्रमाणात पत्रे बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. वाऱ्यामुळे यातील काही पत्रे खाली प्रवाशांच्या अंगावर पडून अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज जलवाहतूक सुरू होऊन जवळजवळ दोन महिने उलटून गेले असल्याने व काढण्यात आलेल्या पत्र्यांमुळे पर्यटक प्रवाशांना भरपावसात भिजत, तर कधी भरउन्हात उभे राहून बोटींची वाट पाहावी लागत आहे.
वाहनांची संख्या वाढवा
जेट्टीवरील ठिकाणी जेट्टी ते वाहनतळ ठिकाणी ये-जा करताना दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, स्तनदा माता व आजारी रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या वाहनांची संख्या 1 ते 2 असून, प्रवाशांची संख्या लक्षात घेता तीसुद्धा सेवा देण्यासाठी अपुरी व कमी पडत आहे. यामुळे शारीरिक क्षमता कमजोर असलेल्या प्रवाशांना सामानसुमानासह चालत जाताना मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पाण्याची सोय नसल्याने आर्थिक भुर्दंड
जेट्टीवर प्रवाशांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अधिकचे पैसे देऊन विकतचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागतो आहे. तसेच जेट्टीवर शौचालयाची कोणतीच सोय उपलब्ध नसल्याने महिला प्रवाशांसह सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आजारी रुग्ण, दिव्यांग, यांना बोटीतून चढ उतार करताना व्हीलचेअरची सुविधा नाही. यासोबतच बोटीत जाण्यासाठी वाट पाहात रांगेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना बसण्याची कोणतीच सुविधा नाही. याठिकाणी असलेल्या गैरसोयीबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ प्रशासन कधी जागे होऊन कधी लक्ष देतील? हा मोठा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मांडवा जेट्टीवरील प्रवासी जेट्टीचे आयआयटी मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधी शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. ते काम टेंडर काढून लवकरात लवकर करणार आहोत. तसेच जेट्टीवरील पत्र्यांच्या शेडचे काम रेमंड कंपनी करत असून, त्यांना काम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. ते काम पाऊस असल्याने संथगतीने सुरू करण्यात आले. यासोबतच इतर असुविधांचा विचार करून पाठपुरावा केला जात आहे.
प्रवीण पाटील,
महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकारी







