सागराच्या कडेला भराव करुन सिमेंटचे तांडव
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यात विकासाचं गाणं गायलं जातंय, पण प्रत्यक्षात गावच बुडवण्याचं काम सुरू आहे. औद्योगिक प्रकल्प, बंदरं, सिमेंटचे यार्ड्स आणि धनदांडग्यांचे बंगले हे सगळं समुद्रात माती भरून उभं राहात आहे. नैसर्गिक नाले बुजविण्यात आल्याने पावसाच्या पाण्याला मात्र कुठेही वाट नाही. परिणामी, यंदाच्या पावसात उरण तालुका बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रगतीच्या नावावर ही सरळ-सरळ पर्यावरणाची हत्या आहे, असं गावकरी ठणकावून सांगत आहेत. कारण, नैसर्गिक नाले बुजवले गेले, भरावामुळे पाण्याच्या वाटा बंद झाल्या आणि आता उरण तालुक्यातील अनेक गावांना पाण्यात बसण्याचा इशाराच मिळाला आहे. घरं खाली, भराव वर, मग पाणी कुठं जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जेएनपीएने साडेबारा टक्के भूखंडासाठी भराव केला, इतर खासगी कंपन्या समुद्रात घुसल्या. शेतजमिनी विकत घेऊन मोठमोठी अनधिकृत यार्ड्स उभी केली. आणि निचऱ्याचे मार्ग? ते मातीखाली गाडले गेले. आता पावसात पाणी घरात घुसलं, तर जबाबदार कोण?असा प्रश्न उरणची जनता विचारत आहे. गावाबाहेर भराव उंच, गाव मात्र खोल म्हणजे पावसाचं पाणी थेट घरात, मंदिरात, शाळेत घुसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासन मात्र दरवर्षी पावसाळ्यात डोळे उघडतं, आणि पावसाळा संपला की विसरून जातं. हा खेळ किती दिवस चालणार? सावध व्हा, आता लढा पाण्याविरुद्ध नाही, तर बुडवणाऱ्यांविरुद्ध आहे, असा इशारा सामजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.