दहावीचा निकाल लांबणीवर?

संगणकीय प्रणालीमध्ये बिघाड
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळांकडून निकालासंदर्भात संगणकीय प्रणालीमध्ये करण्यात आलेल्या नोंदी आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहावी निकालासंदर्भात राज्यातील सर्वच शाळांनी शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाकडे संगणकीय प्रणालीमार्फत विद्यार्थीनिहाय गुण नोंदणी उपलब्ध करून दिली आहे; मात्र यात नोंद करताना त्रुटी, चुका राहिल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्याने मंडळाने या चुका दुरुस्त करून देण्याचा आदेश शाळांना दिला होता. यासाठी 3 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत राज्यातील 97 टक्के शाळांनी आपले कामकाज पूर्ण केले आहे. मात्र तरीही काही चुका राहिल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी 9 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतरही त्रुटी राहिल्यास शाळा आणि मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे.

कोरोना आणि त्यामुळे राज्यात कडक निर्बंध असतानाही शाळा आणि शिक्षकांकडून निकाल आणि त्यासाठीचे कामकाज तयार करण्यासाठी बरेच मोठे परिश्रम घेतले असल्याने राज्यात केवळ 10 टक्के, तर मुंबईत 17 टक्के निकालाचे कामकाज शिल्लक राहिल्याचं परीक्षा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं.

Exit mobile version