व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाचा फटका; मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील ट्रॉपिकाना हॉटेलमधील स्विमींग पूलमध्ये काम करताना 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजेच्या झटक्याने तो जागीच मयत झाला. या घटनेने मुशेत ग्रामस्थ आक्रमक झाले. कित्येक तास तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मृताला न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
प्रणय विजय जरंडे असे या तरुणाचे नाव असून वर्षभरापासून स्विमींग पूलमध्ये तो काम करत होता. सकाळी नेहमीप्रमाणे तो कामावर आला. स्विमींग पूलमध्ये विजेचा धक्का लागतो, अशी माहीती व्यवस्थापनाला होती. तरी देखील त्या ठिकाणी व्यवस्थापनाने प्रणयला काम करण्यास भाग पाडले. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी ट्रॉपिकाना हॉटेलमध्ये गर्दी केली. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जनरल मॅनेजरला समोर आणा तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
हॉटेल व्यवस्थापक पोलिसांच्या आडोशाला
गेल्या अनेक दिवसांपासून शॉक लागत असल्याची माहिती व्यवस्थापनाला असून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हॉटेलमध्ये काम करताना विजेच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी हॉटेल व्यवस्थापनाला भेटून मृताला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी व्यवस्थापकाला हॉटेलमध्ये सुरक्षा देऊन ग्रामस्थांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मांडव्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील ग्रामस्थांवर भडकले. पोलिसांच्या या भुमिकेबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
चित्रलेखा पाटील यांची आक्रमक भूमिका
मुशेतमधील ट्रॉपिकाना हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी घटली. हॉटेल व्यवस्थापक ग्रामस्थांना तसेच कुटूंबियांना भेटण्यास टाळाटाळ करीत होते. ही बाब चित्रलेखा पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन कुटूंबियांची भेट घेतली. तसेच हॉटेल व्यवस्थापकाला दुरध्वनीवरुन संपर्क साधला. याशिवाय त्यांनी केलेल्या चुकीला शेकाप कधीच पाठीशी घालणार नसल्याचे सांगत त्यांना झापले.
दोन दिवसांत मागण्या पूर्ण करा अन्यथा…
शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी मुशेतमध्ये जाऊन हॉटेल व्यवस्थापक कृपाल निगी यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी प्रणयच्या आई-वडिलांना 2 कोटी रुपयांची मदत, 50 हजार रुपये दर महिना आई वडीलांसाठी पेन्शन तसेच कंत्राटी कामगारांना कायम करणे, सवलती देणे, त्यांना अजीवन मेडीकल सवलतीची मागणी केली आहे. दोन दिवसात या मागण्या पूर्ण करण्याचे व्यवस्थापनाने आश्वासन दिले असून दोन दिवसात निर्णय घेतला नाही, तर आक्रमक भूमिका घेऊ, अशी भूमिका चित्रलेखा पाटील यांनी घेतली. याशिवाय मागण्या पूर्ण होत नाही तोवर हॉटेल बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थांची केली. यावेळी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले.
हॉटेल व्यवस्थापनाला तातडीने ग्रामस्थ तसेच नातेवाईकांसमोर हजर राहून घडलेल्या घटनेची कुटूंबियांना माहिती देणे गरजेचे आहे. आज हॉटेलमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणतीही उपाययोजना नाही, ही खेदाची बाब आहे. शेकापची जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून कुटूंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांना योग्य तो न्याय तातडीने मिळावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
चित्रलेखा पाटील, शेकाप, जिल्हा महिला आघाडी प्रमुख