| चिपळूण | प्रतिनिधी |
तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीच्या पात्रात एका 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल संदीप कदम असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल कदम हा मंगळवार (दि.20) सायंकाळपासून बेपत्ता होता. नातेवाईक व मित्रपरिवार त्याचा शोध घेत होते. बुधवारी (दि.21) सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीच्या पात्रातील पिंपळाचा डोह या ठिकाणी साहिलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. साहिलचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने कुटरे बौद्धवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.