| पेण | प्रतिनिधी |
दादर गावचा तरूण संदेश गोरख पाटील (45) याला गवतात पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप पाटील याच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, सदरील घटना शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील यांना समजताच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मृताच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सुचना केल्या.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, दादर गावामध्ये अनेक तरुण उदनिर्वाहासाठी मासेमारी करण्यास दादर रावे खाडीमध्ये जात असतात. रोजच्याप्रमाणे संदेशसह अन्य तीन तरुण भालचंद्र पाटील, संतोष पाटील, पद्माकर घरत हे चिंबोरी (खेकडे) पकडण्यासाठी जात होते. रावे खोकरी याठिकाणी गेल्यानंतर संदेश गवतात कोलमडून पडला. त्याला काय झाले हे मागे असणाऱ्या तिघांना समजले नाही. त्यातील एक जण पुढे सरसावला. परंतु त्याच्या पायात गमबुट असल्याकारणाने तो वाचला. त्यावेळी त्याला किरकोळ विजेचा धक्का लागून तो पडला. काय प्रकार होतोय हे पाहण्यासाठी इतर दोघे धावत आले. तोपर्यंत जीवंत विजेची तार गवतात पडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी समयसुचकता दाखवत एकामेकांना सावध केल्यामुळे अन्य तिघांचा जीव वाचू शकला.
संदेश याच्या उजव्या पायाला जीवंत विजेची तार लागून ढोपऱ्या खालील भागाला जखम झाली. याविषयी दादर सागरी पोलिस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस निरिक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी तलाठयांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.