। पाली/बेणसे । वार्ताहर ।
तौक्ते वादळाने मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाऊस पडला. त्यानंतर काही दिवसांतच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परिणामी यंदा मुठ्यांचे (चिंबोर्यांची एक जात) आगमन लवकर झाले आहे. त्यामुळे खवय्यांना आंनद झाला आहे. चविष्ठ व लज्जतदार मुठ्यांना खवय्यांची पसंती असते. त्यामुळे आता खवय्यांची प्रतीक्षा संपली आहे.
तौक्ते वादळामुळे आलेला पाऊस व मान्सूनपूर्व सरींमुळे माळरान, शेत, डोंगर उतारावर जमीन ओली झाली. गवताची कोवळी पाती डोलू लागली आणि कोवळ्या गवतावर गुजराण करणारे व फक्त पावसाच्या सुरुवातीलाच बाहेर पडणारे मूठे आता वेळेआधीच बिळातून बाहेर आलेले पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. तसेच चिकन, मटणाचे भाव देखिल खूप वधारले आहेत. अशावेळी फक्त पावसाळ्यात बाहेर पडणारे मुठे खवय्यांना आकर्षित करतात. पौष्टीक अणि चविष्ठ मुठ्यांना सध्या मागणी वाढत आहे.
यंदा मुठे लवकरच बाहेर आले आहेत. विकत आणण्यापेक्षा अनेक जण मुठे पकडणे पसंत करतात. मुठे विकून अनेकांच्या हाताला दोन पैसे मिळतात. काहीजण मित्रपरिवाला भेट म्हणून देखील देतात. मुंबई, पुणे आदी शहरांध्ये राहणारे लोक गावाकडून हमखास मुठे नेतात. शहरात 120 ते 100 रुपये डझनावर मुठे मिळतात असे पालीतील खवय्ये व मुठे पकडणारे सुहास लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुठे खाण्यासाठी पावसाची वाट पाहत असतो. खवय्यांना नेहमीच त्यांचे आकर्षण असते. यंदा मुठे वेळेआधी आल्याने खूप आनंद होत आहे.
सर्जाराव घोडके, खवय्ये
कुठे सापडतात?
पहिल्या पावसानंतर आलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, शेत, डोंगर, ओहळ, नदी आणि खाडीच्या किनारी मुठे सापडतात. रात्रीच्यावेळीच रिमझिम पावसात हे मुठे गवत खाण्यासाठी बाहेर पडतात. कोवळे गवत आपल्या नांग्यांनी तोडून बिळात नेवून निवांत खातात.
चविष्ट व आरोग्यवर्धक
आकाराने लहान असल्या तरी त्यांचे मांस चविष्ट व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळया प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाले जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढुन त्यामध्ये मुग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधुन कालवण तयार केले जाते. आतील गराबरोबरच हे भरलेले मिश्रण चविष्ठ आणि लज्जतदार लागते.
Related