पाण्याची समस्या गावागावात सुरु
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या जिल्ह्यातील फक्त चारच धरणांमध्ये मुबलक पाणी पुरवठा आहे. मात्र, उर्वरित 24 धरणांनी तळ गाठला आहे. त्यामध्ये 12 धरणांमध्ये फक्त आठ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूड, तळा, रोहा, पेण, अलिबाग, उरण या सहा तालुक्यातील प्रत्येकी एक तसेच सुधागडमधील पाच, श्रीवर्धनमधील तीन, म्हसळामधील दोन, महाडमधील चार, कर्जतमधील दोन, खालापूरमधील तीन, पनवेलमधील तीन अशा एकूण 28 धरणांद्वारे रायगडसह अन्य जिल्ह्यातील गावे, वाड्या, कंपन्या, व शहरी भागात पाणी पुरवठा केला जातो. सध्या तापमानात वाढ होत आहे. उन्हाचे चटके बसत आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील कमी होत आहे. धरणांमधील पाणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याची समस्यादेखील गंभीर होेण्याची भिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील फणसाड, श्रीगाव, कोथुर्डे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, उन्हेरे, अवसरे, कवेळे, रानीवली, कलोते- मोकाशी, डोणवत, या बारा धरणांमध्ये फक्त सहा ते 26 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सुतारवाडी, आंबेघर, कार्ले, पाभरे, वरंध, खिंडवाडी, खैरे, साळोखे, भिलवले, मोरबे, बामणोली, पुनाडे या 12 धरणांमध्ये 29 ते 49 टक्के तर आंबेघर, कुडकी, संदेरी उसरण या चार धरणांमध्ये 59 ते 71 टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे28 धरणांपैकी 12 धरणांमध्ये आठ दिवस पाणी पुरेल इतके शिल्लक आहे. तर अन्य बारा धरणांमध्ये पंधरा दिवस व चार धरणांमध्ये 25 दिवस पाणी पुरेल इतके शिल्लक राहिले आहे. रायगडसह नवी मुंबईला या धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने कपातीकरणदेखील जोरात सुरु आहे. त्याचा फटका जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे.
पाण्याचा वापर जपून करा धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत काही धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. तर काही धरणांमध्ये सहा ते पंधरा दिवस पुरेल इतके पाणी आहे. अनेक ठिकाणी कपातीकरण सुरु केले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. पाण्याचा अपव्य करू नये असे आवाहन लघुपाट बंधारे विभागाने केले आहे.