मांडवा-अलिबाग, सारळ-कार्लेखिंड आणि कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांचे काम रखडलेलेच
| रायगड | खास प्रतिनिधी |
सरकार, त्यांचे मंत्री आणि आमदार हे जिल्ह्यातील विकासाच्या वारेमाप गप्पा मारत असतात. मात्र आज देखील मांडवा-अलिबाग, सारळ-कार्लेखिंड आणि कालखिंड ते थळ या रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या रस्त्याच्या कामाची घोषणा केली होती; मात्र सुमारे दोन वर्षानंतर देखील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सागरी महामार्गाशी संलग्न असलेल्या मांडवा ते अलिबाग, सारळ-कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांची सुधारणा करण्याचा समावेश रेवस -रेड्डी सागरी महामार्गाच्या प्रकल्प अहवालात करण्यास तत्कालीन राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्याबाबतची माहिती तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांनी दिली होती. या रस्त्यांच्या अद्ययावतीकरण आणि सुधारणा करण्यासाठी त्याचा सागरी महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यामध्ये समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले होते.
राज्य सरकारने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले होते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या सागरी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती देखील करण्यात आली होती.
गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान उपलब्ध असलेली जलवाहतूक सुविधा व प्रस्तावित रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग यामुळे दळणवळणाची चांगली सुविधा होत आहे. मात्र मांडवा ते अलिबाग दरम्यान सुलभ दळणवळणासाठी मांडवा ते अलिबाग, सारळ ते कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांची सुधारणा करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात मुंबईतून गेटवे मार्गाने जलवाहतूकीने अलिबाग येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. काही पर्यटक चारचाकी वाहने देखील आणतात. मात्र हे मार्ग अतिशय अरुंद असल्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी चालणे देखील मुश्कील होते.
यातून सर्वांचीच सुटका होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या मार्गांचा विकास करण्याचे योजले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विकास कामाचा वेग मंदावला आहे. आता पुन्हा तटकरे या सत्तेमध्ये सहभागी झाल्या आहेत. सध्या त्या पालकमंत्री नसल्या तरी, त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या आता या मार्गाचा कसा विकास साधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.