आ. जयंत पाटील यांची शरद पवार यांना विनंती
| श्रीवर्धन | विशेष प्रतिनिधी |
सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत काम करणारा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत. शरद पवार यांनी पहिली कर्जमाफी केली आणि मुख्यमंत्री अंतुले यांनी दुसरी केली. आता काळ बदलला आहे. काही लोकं केलेले उपकार विसरून जातात. त्यामुळे बेईमान लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका आणि आम्हाला अडचणीत आणू नका, अशी विनंती आ. जयंत पाटील यांनी शरद पवार यांना केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.27) पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, आ. रविंद्र वायकर, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील, माजी आ. मुश्ताक अंतुले, माजी आ. सुरेश लाड, जे.एम. म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील, काँग्रेसचे नेते आर.सी. घरत तसेच शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, श्रीवर्धनमध्ये बॅ. अंतुले यांनी मोलाची कामगिरी केली आहे. श्रीवर्धन हा बालेकिल्ला दुसरा कुणाचा नाही, तर अंतुले यांचा आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये त्यांचेच नाव राहिले पाहिजे. आमच्यामध्ये मतभेद होते. आम्ही त्यांच्या विरोधात लढाया केल्या. त्यासाठी आम्ही शरद पवार यांचा वेळप्रसंगी ओरडाही खाल्ला. श्रीवर्धन बालेकिल्ला कुणाचा या चर्चेवर आज बोलणार नाही. परंतु आगामी इंडिया आघाडी बैठकीत नक्कीच बोलेन, असेही त्यांनी सूचित केले.
आज सर्वात जास्त आनंद अनंत गीते यांचा चेहऱ्यावर दिसत आहे. मागच्या निवडणुकीत मोठी चूक केली. आमच्या वडिलांनी सांगितलं आहे की, शरद पवार यांना कधी सोडायचं नाही. त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. फक्त शरद पवार यांना विनंती आहे कि, कोणत्याही बेइमान लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका. आपल्याला बदला घ्यायचा आहे, असेही ते म्हंटले.
श्रीवर्धन परिवर्तन होणार
बॅ. अंतुले यांनी कायमच समाजकारणाला महत्व दिलं. त्यांनी सर्वसामान्यांचं काम करण्याला प्राधान्य दिलले. ते या जिल्ह्याचे मुख्यमंत्री झाले याचा कायमच अभिमान आहे. श्रीवर्धन घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. चुकीच्या माणसांना साथ देण्याची चुक झाली. मात्र श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या काळात नक्कीच परिवर्तन होईल. मुश्ताक अंतुले आता पुन्हा आपल्याला वैभव उभं करायचं आहे, असे म्हणत आ. जयंत पाटील यांनी मुश्ताक अंतुले यांना बळ देणार असल्याचे स्पष्ट केले.
देशपातळीवर बँकेचे अनेक उपक्रम
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने देशपातळीवर अनेक उपक्रम राबविले. राज्यातील जिल्हा बँकांमध्ये स्वतःचे सॉफ्टवेअर बनविणारी ही पहिली बँक आहे. किसान क्रेडिट कार्ड ही योजना देखील यशस्वी राबविण्यात आली. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना या बँकेने राबविल्या आहेत. शरद पवार तसेच अंतुले यांनी केलेल्या कर्जमाफीमुळे आज ही बँक जिवंत असल्याचे आ. जयंत पाटील यांनी प्रामाणिकपणे सांगितले.