| अलिबाग | प्रतिनिधी |
खोटे दस्तऐवज करून जमिनी हडपणाऱ्यांच्या विरोधात दादर गावांतील ग्रामस्थांसह सरपंच व उपसरपंच यांनी एकत्र येऊन उपोषण सुरु केले आहे. सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आहे. दादर येथील सरकारी पड सर्वे नं. 362 या जमीनीसंदर्भात सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे 1989 पासून पुराच्या पाण्याने गावातील बांधकाठे तुटून खारेपाणी शेतीत शिरत आहे. त्याचा परिणाम भात शेतीवर झाला आहे. भातशेती उध्वस्त झाल्याने येथील शेतकरी गंभीर परिस्थितीत आपल्या कुटुंबाची उपजिवीका करीत आहेत. या जमिनी छुप्या पध्दतीने विकत घेण्याचा घाट घालण्यात आला आहे, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
दादर येथील सर्वे नं. 362 सरकारी पड आकार या क्षेत्रामध्ये सरकारने वाटप केलेल्या काही जागांसंदर्भात कोणत्याही निकषांचे व नियमांचे पालन न करता खोटे दस्तऐवज करून शासकीय अधिकाऱ्याच्या मदतीने सातबारा नावावर केला जात आहे. कवडांळ येथील आकाश ठाकूर नामक व्यक्तीने खोटे दस्तऐवज तयार करून जमिनी स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप दादर ग्रामपंचायतीच्या सरपंचासह येथील ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेत याबाबत ठराव घेऊन चौकशी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र आजतायगत महसूल विभागाकडून त्याबाबत कोणताही कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ पाटील यांच्या नृेत्वाखाली सरपंच तेजस्वी म्हात्रे, उपसरपंच मंगेश पाटील, हितवर्धक सामाजिक संघटनाचे दिपक पाटील, राजा जोशी, ए.बी. पाटील, प्रमोद पाटील, राजेश ठाकूर, भास्कर पाटील आदी पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामपंचात सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. याबाबत पेणचे उपविभागीय अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.