। जळगाव । वृत्तसंस्था ।
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून सराफा बाजारामुळे जळगावची सुवर्णनगरी अशी ओळख आहे. शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला राहिलेला जळगाव मतदारसंघाकडे यंदा मात्र विशेष लक्ष आहे. कारण आता शिवसेना आणि भाजप युती तुटली आहे. या बदलेल्या राजकीय समीकरणामुळे यंदा हा जळगावचा गड कोण राखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महायुतीतील जागावाटपाचा विचार करता भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचीच उमेदवारी कायम राहणार असा विश्वास सर्वांना होता. मात्र भाजप नेतृत्वाने जळगाव मतदारसंघात मोठी राजकीय खेळी खेळत ऐनवेळी स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केली. तर महाविकास आघाडीकडून भाजपमधून फुटून ठाकरे गटात आलेल्या करण पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. वंचित बहुजन आघडीकडून नुकतीच जळगावमध्ये प्रफुल्ल लोढा यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे यंदा या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या 35 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे. मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचेच खासदार निवडून आलेलं पाहायला मिळते. पण त्यापूर्वी देशभरातील इतर सगळ्याच मतदारसंघांप्रमाणं इथंही काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे हरि विनायक पाटसकर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार होते. पण नंतर हा मतदारसंघ भाजपने काबीज केला. त्यानंतर यशवंत महाजन, हरिभाऊ जावळे आणि ए.टी. पाटील यांनी भक्कमपणे धुरा सांभाळत याठिकाणचा भाजपचा बोलबाला कायम ठेवला. शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला असल्यामुळे शिवसेनेने याठिकाणी कधी उमेदवार मैदानात उतरवला नाही. त्यामुळं या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एक नवी नोंद नक्कीच होणार आहे. कारण भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात असलेला प्रमुख उमेदवार हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा असणार आहे.