। नेरळ । प्रतिनिधी ।
वादळी वारा आणि अवकाळीसह आलेल्या गारपिटीने कर्जत तालुक्याला झोडपले आहे. या पावसाने नसरापूर ग्रामपंचायतमधील दोन घरे उध्वस्त झाली आहेत. तर उन्हाळी राजनाल्याच्या पाण्यावर लावलेल्या शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आहेत.
कर्जत तालुक्यात (दि.13) आणि (दि.14) मे रोजी वादळी वार्याने पावसाळा सुरुवात झाली. यामुळे ग्रामपंचायत भागातील तब्बल 15 विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळले आणि त्यामुळे चांधई तसेच आसपासच्या सर्व गावातील लोकांची विजे अभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली. याच भागातील बर्याच ठिकाणी अत्यंत मोठ्या अश्या गारांचा वर्षाव मंगळवारी संध्याकाळी झाला. एवढ्या मोठ्या गारा गोळा करण्यासाठी धावपळ करीत असताना आकाशातून वेगाने गारांच्या अंगावर पडण्याने अनेक लोक जखमी झाले. तर, वादळाने अनेकांच्या घरांची पत्रे उडाली. नसरापूर आणि चांधई येथील शेतकर्यांची घरे देखील उद्ध्वस्त झाली. सरकार तसेच प्रशासन यांच्याकडून पंचनामे करून घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.





