| मुंबई | प्रतिनिधी |
गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढायला स्कोपच नाही. तर पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या सहाही राज्यात भाजपच्या जागा कमी होतील, असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यनिहाय सविस्तर विश्लेषण करुन लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष 220 ते 250 दरम्यान जागा जिंकेल, एनडीएला 272 हा बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही, अशी तर्कसंगत मांडणी पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी केली.
आकड्याची भविष्यवाणी करणे धोक्याचे असते, लोकांच्या मनात काय आहे हे स्पष्ट कळत नाही, आपण अंदाज बांधू शकतो, ढोबळ अनुमान लावू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ घेऊन सांगतो, की बहुतांश राज्यात भाजपचा परफॉर्मन्स इतका चांगला होता, की वर जायला आता जागाच नाही. उदा. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यात वर जायला आता जागाच नाही, झाल्या तर जागा कमीच होतील. माझ्या मते सहा राज्यं महत्त्वाची आहेत, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा.. या सहाही राज्यात भाजपच्या जागा कमी होतील. भाजपवाले म्हणतात की, यूपीमध्ये आमच्या जागा वाढतील, बंगालमध्ये वाढू.. पण मला तसे वाटत नाही, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.