अंतिम सामन्यात चमकदार कामगिरीचा विश्वास
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने निराशाजनक कामगिरी केली आहे. परंतू, भारतीय संघाच्या दिग्गजांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते विराट कोहली अंतिम सामन्यात नक्कीच चमकदार कामगिरी करेल.
यावेळी भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, विराट कोहलीने हे लक्षात ठेवायला हवे की 2011चा एकदिवसीय विश्वचषक महेंद्रसिंग धोनीसाठी ही फारसा चांगला गेला नाही. परंतू, त्याने अंतिम सामन्यात फॉर्म मिळवला. कोहली इतका चांगला खेळाडू आहे की त्याने स्लोगिंग करू नये. तो चेंडू त्याच्या क्षमतेनुसार खेळू शकतो आणि तो कोणत्याही गोलंदाजीवर वर्चस्व गाजवू शकतो.
तसेच, उपांत्य फेरीत भारतीय संघाचा विजयी झाल्यावर बोलताना स्वतः कर्णधार रोहित शर्माने, विराट कोहली हा मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे 15 वर्षांचा अनुभव आहे. तो कदाचित अंतिम सामन्यात कमाल करू शकतो, असे म्हटले होते. विराट कोहलीचे चाहते कदाचित या गोष्टीला पूर्ण समर्थन दर्शवतील की, कोहलीने संपूर्ण कारकिर्दीत अधिक दबाव असणार्या सामन्यांमध्येच उत्तम कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेसुद्धा विराट कोहलीच्या फॉर्मबाबत महत्त्वाकांक्षी शक्यता वर्तवली आहे. द्रविड म्हणाला की, जोखीम जास्त असणारा खेळ हा कधी कधी आपल्यावरच उलटू शकतो. विराटच्या बाबत हे अनेकदा होते. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यातही त्याने एका षटकारासह सुरुवात चांगली केली होती. पण, तेव्हा चेंडू जास्तच वळला. काहीही असले तरी मला त्याचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आवडतो, त्याचा हेतू चांगला असतो. संघासाठी एखादी व्यक्ती जोखीम उचलू पाहतेय यामुळे इतरांसमोर चांगलं उदाहरण सेट होतं. पुढे मस्करीत द्रविड असेही म्हणाला की, मला आता नजर लावायची नाही. पण मला वाटते आगामी सामन्यांमध्ये त्याची वचनबद्धता आणि मुळात खेळण्याचा अंदाज काही मोठे बदल घडवू शकतो. आणि कोहली त्यासाठी नक्कीच पात्र आहे.