वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफीवर कब्जा
| बर्मिंगहॅम | वृत्तसंस्था |
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला आहे. यासह युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय चॅम्पियन्स संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे. भारत चॅम्पियन्सने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तान चॅम्पियन्सचा दारुण पराभव केला. इंडिया चॅम्पियन्सचा सलामीचा फलंदाज अंबाती रायुडूला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. अंबाती रायडूने अंतिम सामन्यात भारतीय चॅम्पियन संघाच्या विजयाचा पाया रचला होता.
बर्मिंगहॅम येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन्सने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तान चॅम्पियन्सला 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावांवर रोखले. भारतीय चॅम्पियन्ससाठी वेगवान गोलंदाज अनुरीत सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय इंडिया चॅम्पियन्सकडून विनय कुमार, पवन नेगी आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला आहे. पाकिस्तान चॅम्पियन्सकडून शोएब मलिकने 36 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक 41 धावा केल्या ज्यामध्ये त्याने तीन षटकार ठोकले.
प्रत्युत्तरात भारतीय चॅम्पियन्सने 19.1 षटकांत 5 गडी गमावून 159 धावा करत विजयाची नोंद केली. भारत चॅम्पियन्स संघासाठी, अंबाती रायडूने अंतिम सामन्यात 30 चेंडूत 50 धावा केल्या. रायडूने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय गुरकीरत सिंग मानने 34 आणि युसूफ पठाणने 30 धावा केल्या. पाकिस्तानकडून आमिर यामीनने दोन बळी घेतले. याशिवाय सईद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.