उद्धाटन सोहळ्यात ठाकरे,राणे यांची जुगलबंदी
ज्योतिरादित्य शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती
चिपी | प्रतिनिधी |
निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे.याचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांची पाऊले कोकणच्या भूमीत पडली पाहिजेत.त्यासाठी विमानसेवा उपयुक्त ठरणार असून, चिपी विमानतळामुळे खर्या अर्थाने कोकणाने विकासाची गरुडभरारी घेतली आहे,असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.याच कार्यक्रमास उद्धव ठाकरे,नारायण राणे यांची राजकीय जुगलबंदी पहावयास मिळाली.बाभळी,आदळाआपट,
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय नागरी हवाई उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीतून ऑनलाईन तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,केंद्रीय मंत्री नारायण राणे,रामदास आठवले यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मंत्री,खासदार,आमदार,मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.सत्तरहून अधिक मान्यवरांना घेऊन पहिले विमान चिपी विमानतळावर दाखल झाले.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे,नारायण राणे हे प्रथमच एका व्यासपीठावर आल्याने उभयता काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.तशी जुगलबंदी व्यासपीठावर घडलीच.राणे यांनी आपल्या भाषणातून सिंधुदुर्गचा विकास केवळ आपल्याच प्रयत्नातून झाल्याचा दावा केला. नारायण राणे यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी शेलक्या भाषेत थेट राणेंवर प्रहार केले. मुख्यमंत्री भाषणात म्हणाले, आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.
किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला. असंही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.
तसेच, कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचे वैभव ही जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधळा सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचं लोकार्पण आज झालेलं आहे. असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं आहे.
उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री
विमानतळाला विरोध करणारे इथे स्टेजवरच आहेत, भांडं काय फोडायचं आणि किती फोडायचं? ाच जागेवर मी आणि प्रभू 15 ऑगस्ट 2009 रोजी भूमिपूजन करायला आलो होतो. तेव्हा समोर आंदोलन होत होतं की भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. विरोध होत होता. किती विरोध होत होता. मी नावं घेतली तर राजकारण होईल.
नारायण राणे,केंद्रीय मंत्री
चिपी विमानसेवा सुरु झाल्याने कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे.भविष्यात या विमानतळाचा विस्तार करण्याबाबत विचार केला जाईल.माझे महाराष्ट्राशी भावनिक,रक्ताचे संंबंध आहेत.त्यामुळे राज्याच्या विकासाला माझा नेहमीच सक्रिय पाठिंबा राहील.
ज्योतिरादित्य शिंदे,केंद्रीय मंत्री
यावेळी रामदार आठवले,उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदींनी विचार प्रकट केले.सूत्रसंचालन खा.विनायक राऊत यांनी केले.