| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ-माथेरान रस्त्यावर असलेल्या जुम्मापट्टी गावातील शेजारी आपल्या अंगणात बकर्यांच्या लेंड्या टाकू नये म्हणून भांडले. हा प्रकार नंतर हाणामारीपर्यंत पोहोचला असून, नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या जुम्मापट्टी येथे आपल्या अंगणात बकर्यांच्या लेंड्या टाकून ठेवू नये यासाठी महिला शेतकरी आणि शेजारी यांच्यात बाचाबाची झाली. जुम्मापट्टी येथील महिला शेतकरी या आपल्या अंगणातील बकर्यांच्या लेंड्या साफ करीत असताना शेजारी राहणार्यांनी त्यांना हे अंगण आमचे आहे असे बोलून शिवीगाळी आणि दमदाटी करुन महिला शेतकरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अजय व्यक्तीला ढकलून दिले. त्या दोघांना ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि हाताला दुखापत झाली असल्याने त्यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठले. त्या गोष्टीचा शेजार्यांनी मनात राग धरून संगनमत करुन लाकडी काठीने महिला शेतकर्यांच्या डाव्या हातावर उपट मारुन दुखापत केली. त्यावेळी त्यातील एकाने बायकांना का मारतोस असे बोलले असता त्यांनादेखील लाकडी काठीने डोक्यात उपट मारुन दुखापत केली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक युवराज साळुंखे करीत आहे.







