| रायगड | वार्ताहर |
रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणार्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष राहावे, तसेच मान्सूनपूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्र. पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवार्याची सज्जता करावी. तसेच या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे 31 मेपूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदतकार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. सर्व शासकीय यंत्रणांनी आपदा मित्रांची बैठक घेऊन नियोजन करावे. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी.
याचबरोबर अतिवृष्टीमध्ये नागरिकांनी धबधब्याच्या ठिकाणी, गडकिल्ले, धोकादायक ठिकाणी जाऊ नये. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेऊन टप्प्या-टप्प्याने धरणांतून विसर्ग करावा, अशा सूचनाही जावळे यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे, तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के यांनी तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वितबाबत, तसेच विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठवण्याबाबत सांगितले. पुनर्वसन सुरू असलेल्या गावांतील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एनडीआरएफ, होमगार्ड, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.







