| उरण | प्रतिनिधी |
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी द्वारे चालवल्या जाणाऱ्या आरकेएफ विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 11 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले होते. मात्र, जेएनपीएचे चेअरमन उन्मेश वाघ यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मंगळवारी (दि.12) हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. यावर तातडीने लक्ष देत जेएनपीएचे चेअरमन उन्मेश वाघ यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न येत्या पंधरा दिवसांमध्ये सोडवण्याची हमी दिली. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत चेअरमन उन्मेश वाघ, उपाध्यक्ष अनिरुद्ध जोशी, व्यवस्थापक विनय मल्ह, आणि सचिव म्हणून मनीषा जाधव यांच्यासह माजी आमदार मनोहर भोईर, भूषण पाटील, शालेय मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.







