दोन महिन्यांची महिलांना दिली मुदत
| रायगड | प्रतिनिधी |
लाडकी बहीण योजनेत शासकीय महिला कर्मचारी, पुरुष लाभार्थी तसेच अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची बाब समोर आली. यामुळे या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2 कोटी 52 लाख लाभार्थींपैकी सुमारे 27 ते 28 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. गरजू महिलांच्या खात्यातच पैसे जमा व्हावेत यासाठी सरकारने आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. लोकप्रिय ठरलेल्या या योजनेने महायुतीचे सरकार कायम राहिले, मात्र आता या योजनेत दिवसेंदिवस अपात्र महिलांची संख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे 14 हजार 298 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आता सरकारकडूनच उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठीच लाडकी बहीण योजनेतील महिलांचे ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दोन महिन्यांच्या आत हे ई केवायसी करायचे आहे, असे न करणाऱ्या महिला या योजनेस अपात्र ठरणार आहेत. यासाठी सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या आधारकार्डचा क्रमांक टाकून आधारकार्ड प्रमाणिकरण करून घ्यायचे आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेला आपल्या पती किंवा वडिलांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर महिलांना आपण सरकारी नोकरी करीत नसल्याचे घोषणापत्रही भरून द्यावे लागणार आहे.
कसे कराल प्रमाणिकरण?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन eKYC Banner वर क्लिक करायचे आहे. यानंतर आपले आधार प्रमाणिकरण करण्यासाठीचा फॉर्म भरल्यानंतर ओटीपीच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर. ईकेवायसी आधी झाले आहे की नाही हे स्पष्ट होईल. त्यानंतर लाभार्थीचे नाव यादीत आहे की नाही याची तपासणी संकेतस्थळावर होईल. नसल्यास आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश मोबाईलवर येईल. पात्र असल्यास आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकताच पुढील प्रक्रियेत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक फॉर्ममध्ये भरावा लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या आधारशी जोडेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी अर्जात भरावा लागणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात घोषणापत्र भरून द्यावे लागणार आहे. यामध्ये आपण कोणत्याही सरकारी नोकरीत नसल्याचे तसेच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे नमूद केल्यानंतरच हा अर्ज भरला जाऊन ई केवायसी पूर्ण झाल्याचा संदेश येणार आहे.







