केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी मंजुरी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान मोदींनी 19 नोव्हेंबर देशाला संबोधित करताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळ येत्या बुधवारी म्हणजेच 24 नोव्हेंबरला हे कायदे मागे घेण्यास मंजुरी देईल. यानंतर 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरवातीला कायदा मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संसदीय नियमांनुसार कोणताही जुना कायदा मागे घेण्याची प्रक्रियाही नवीन कायदा बनवण्यासारखीच असते. ज्याप्रमाणे नवीन कायदा करण्यासाठी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर करावे लागते, त्याचप्रमाणे जुना कायदा मागे घेण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर करावे लागते. दुसर्या शब्दांत, जुना कायदा नवा कायदा करूनच रद्द केला जाऊ शकतो.
पंतप्रधानांच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा किंवा राज्यसभेत तीन स्वतंत्र विधेयके किंवा तिन्हींसाठी एक विधेयक मांडले जाईल. हे विधेयक मांडण्यात आल्यानंतर एका सभागृहाने आणि नंतर दुसर्या सभागृहाने चर्चा किंवा चर्चा न करता मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील. विधेयक मंजूर होण्यासाठी किती वेळ लागेल, हे सरकारच्या प्राधान्यांवर अवलंबून असेल.
अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात प्रक्रिया
अधिवेशनाच्या दोन दिवसांत हे विधेयक दोन्ही सभागृहांतून मंजूर करून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल, असा अंदाज पंतप्रधानांच्या घोषणेवरून लावला जाऊ शकतो. अशा स्थितीत पहिल्या आठवड्यातच तिन्ही कृषीविषयक कायदे मागे घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.
शेतकर्यांवरील गुन्हे मागे घ्या
संयुक्त किसान मोर्चा जे गेल्या एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायदे मागे घेण्याबाबत आणि इतर मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. रविवारी झालेल्या बैठकीत. शेतकर्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेणे आणि इतर काही मागण्या करण्यात येणार आहेत. आंदोलन सध्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले. संयुक्त किसान मोर्चाची पुढील बैठक 27 नोव्हेंबरला होणार असून, त्यात पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.