| उरण | प्रतिनिधी |
पावसाळा सुरू होण्यास काही दिवस बाकी असताना उरण तालुक्यात मात्र आपत्ती व्यवस्थापन किती सक्षम आहे, याची पोलखोल करणारे वास्तव समोर आले आहे. उरण-नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या जासई-जेएनपीए बंदराच्या मुख्य रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर आज ही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. एकंदरीत संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षित कामांमुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी सिडको, स्थानिक ग्रामपंचायत, प्रकल्प व्यवस्थापन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित प्रशासन विभाग हे पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक स्रोत, नाले, गटारे, रस्त्यांवरील गटारांची दुरुस्ती तसेच सफाई करण्याची कामे लाखो रुपये खर्च करून करत आहेत. मात्र, भ्रष्ट कारभारामुळे पावसाळ्यात या कामाची पोलखोल रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्यातून होतच असते. यावर्षी ही परिस्थिती ओढावणार नाही याची खबरदारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाला चक्क आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी उरण तालुक्यात होताना दिसत नाही. त्याचे ताजेतवाने उदाहरण म्हणजे उरण-नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या जासई-जेएनपीए बंदराचा मुख्य रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर आज ही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. एकंदरीत संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षित कामांमुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी गाव परिसरातील व रस्त्यांवरील गटाराची कामे पूर्ण करून पूर्ण झालेल्या गटारांची खरोखरच सफाई झाली आहे की नाही याची पाहणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.







