प्रा.एन.डी.पाटील अनंतात विलिन
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा अभिमानाने खांद्यावर घेऊन गेल्या सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे शेकापचे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना मंगळवारी शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देेण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सरकारच्यावतीने तिरंगा लपेटण्यात आला.त्याचबरोबर अखेरच्या प्रवासातही लालबावटा अंगावर लपेटून घेत या लोकनेत्याने या जगाचा निरोप घेतला.
‘अमर रहे’चा जयघोष
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार झाले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी एन.डी. पाटील अमर रहे,लाल सलाम, लाल सलाम एन.डी.पाटील लाल सलाम अशा भावपूर्ण घोषणांनी निरोप दिला गेला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.
शेकापचा लाल सलाम
एनडींना शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने लाल सलाम दिला. यावेळी शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी लाल निशाण अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी अनिकेत देशमुख,राजू कोरडे आदींनीही सरांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली अर्पण केली.
पोलिसांची मानवंदना
पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वर्गीय प्रा.एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रा.पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बावड्यातील रस्त्यांवर त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बावड्यातील नागरिक रस्त्याच्या दुतर्फा थांबून होते. स्मशानभूमीत सर्व मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी स्मशानभूमीत गर्दी केली. ग्रामीण भागातील आलेल्या ग्रामस्थ आणि त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. सोमवारी एनडी यांचे निधन झाले.मंगळवारी त्यांचे पार्थिव येथील शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सरोजताई तथा माई पाटील यांच्यासह पवार,पाटील कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी राज्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अखेरचे दर्शन घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.सत्तर वर्षाच्या कार्यकालात एनडी यांचे सर्वच क्षेत्रात अनुयायी असल्याने त्यांनी आवर्जून अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.मात्र कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.