। सातारा । वृत्तसंस्था ।
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागे घ्यावे” असा आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी आपल्या ट्विटमधून राज्यपालांना दिलाय.