| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम या पाच राज्यांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्र सरकारने या पाचही राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. स्थितीचा आढावा घेऊन योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश केंद्राने या राज्यांना दिले आहेत. देशातील कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोविड विषयक निर्बंध उठवले आहेत. सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परत एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ दिसू लागल्याने धाकधूक निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने दिल्ली, हरयाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांत रुग्णवाढ दिसत असून या राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सतर्क केलं आहे. राजेश भूषण यांनी पाचही राज्यांना पत्र लिहून बदलत असलेल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. त्याचा नियमित आढावा घेण्यात यावा. स्थितीवर बारीक लक्ष ठेवतानाच रुग्णवाढ रोखण्यासाठी आवश्यकती पावले उचलावी, असे निर्देश राजेश भूषण यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
सावधान! तो पुन्हा येतोय; मोदींचा इशारा
कोरोना विषाणू अजून गेलेला नाही. तो पुन्हा येत आहे. तो लोकांना साथीच्या रोगाविरुद्ध लढा सुरू ठेवण्याचा इशारा देत आहे. हा बहुरूपिया कोरोना पुन्हा कधी उगवेल हे कोणालाच माहीत नाही. त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे सुमारे 185 कोटी डोस दिले गेले आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रविवारी (दि.10) गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील माँ उमिया धामच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संबोधित करताना मोदींनी माँ उमियाच्या भक्तांना रासायनिक खतांच्या विळख्यातून पृथ्वी मातेला वाचवण्याच्या उद्देशाने नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. कोरोना हे एक मोठे संकट होते. आम्ही असे म्हणत नाही की हे संकट संपले आहे. हे एक विराम असू शकते. कोरोना पुन्हा कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सुमारे 185 कोटी डोस देण्यात आले आहेत. ज्याने जगाला चकित केले आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.