राजकीय चर्चेला उधाण
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये तासभर खलबतं झाली. या राजकीय भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मिडियावरुनही या चर्चेला प्राधान्य दिले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पाश्वर्र्भूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे
महाराष्ट्रातील राजकारण, शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा, स्वतंत्र सहकार खातं आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राज्यातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्द्यांचे अंदाज बांधले जात आहेत.
चीनच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा
चीन सीमेच्या सद्यस्थितीबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते ए के अँटोनी या दोन संरक्षण मंत्र्यांना विश्वासात घेऊन दिली माहिती. या बैठकीला देशाचे सीडीएस बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज नरवणे हेदेखील उपस्थित होते. चीन वादाची इत्यंभूत माहिती प्रेझेन्टेशन द्वारे या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली. संसदेचे अधिवेशन सुरु होण्याआधी या मुद्द्यावर विरोधकांना शांत करण्याची सरकारची रणनीती सुरु आहे.
देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या मान्यवरांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात केंद्राला अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले.
जयंत पाटील,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष