| महाड | प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तालुक्यातील रामवाडी-घावरेकोंड गावात विविध सामाजिक, शैक्षणिक, विधायक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी श्रीराम विकास मंडळ मुंबईच्या वतीने दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अंगणवाडी आणि गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप नवतरुण मंडळाच्या शिवछञपती युवा मंचच्या वतीने करण्यात आले, तसेच गावातील मधलीवाडी मधील आई जिजाऊ सेवा ट्रस्टच्या वतीने संपूर्ण गावातील रस्त्यावरील विजेच्या खांबांवर पन्नास हजार किमतीच्या मोफत एलइडी लाइट्स लावण्यात आल्या. गावातील एकनिष्ठ संघटेमार्फत खालची वाडी येथे 100 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला, तर रामवाडी-घावरेकोंड ग्रामपंचायतची ग्रामसभा आणि श्रीराम विकास मंडळ मुंबई, पुणे बडोदे आणि फौजी संयुक्त कृती समितीने जाहीर बैठकीचे आयोजन करून गावच्या विविध अनेक महत्त्वाच्या विकासकामांची चर्चा घडवून त्यावर लवकरात लवकर पूर्तता करण्याचे ठरले.
यावेळी कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सौ. सूनिताताई सुतार, ग्रामसेवक ए.बी. राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष महिपत शिंदे, गाव अध्यक्ष ज्ञानदेव सकपाळ, उपसरपंच सतीश जाधव, संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष तुकाराम महाराज शिंदे, सरचिटणीस शिवाजी विठोबा कदम, निरात सांप्रदाय मठाधिपती आनंद महाराज कदम, आई जिजाऊ ट्रस्टचे सरचिटणीस कॅप्टन दिनकर जाधव, फौजी मंडळाचे कॅप्टन दत्ताराम शिंदे, मनोहर भोसले आणि संपूर्ण तंटामुक्ती समिती सदस्य, वरिष्ठ ग्रामस्थ मंडळी, मुंबई, पुणे, बडोदे येथून आवर्जून उपस्थित होते.