| खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबर यादरम्यान संपन्न होणार्या वन्यजीव सप्ताहाच्या निमीत्ताने खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद शाळेच्या सभगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वन्यजीव अभ्यासक अभिजीत घरत यांनी पर्यावरणाच्या समतोल साधणार्या प्राणी आणि सर्प या घटकांवर व्हिडिओ आणि स्लाईड शो द्वारे विस्तृत माहिती देत विद्यार्थी वर्गांच्या मनामधील शंका कुशंका दूर करुन त्यांच्यावर पर्यावरणातील अपरिहार्यता बिंबावण्याची महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. आपल्या सोबत पर्यावरणातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्याच सोबत प्रत्येकाचे जगणे सुसह्य होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे या संदर्भात माहिती देऊन आणि समाज मनातून त्यांच्या बाबतीतील गैरसमज दूर करण्यासाठी खालापूर तालुका वनपरिक्षत्र अधिकारी राजेंद्र पवार आणि वनक्षेत्रपाल भगवान दळवी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेचे रोकडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. गुरुनाथ साठेलकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन सतिश राणे यांनी केले. यावेळी राजेश पारठे, आर.एम.म्हात्रे, एस.एस.चव्हाण, नितीन कराडे, कांचन गायकवाड, संतोषी भास्तेवाड, शितल गायकवाड, मोरे, अमोल ठकेकर, चेतन चौधरी हे यावेळी उपस्थित होते.