विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊचे धडे; नवी मुंबई महापालिकेचा स्तुत्य उपक्रम
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
शहर स्वच्छतेमध्ये सर्व घटकांचा सहभाग असावा, यादृष्टीने नवी मुंबई महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता महापालिका ‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना साकारली जात आहे.
‘वेस्ट टू बेस्ट प्रोजेक्ट’ असे या स्पर्धात्मक उपक्रमाचे शीर्षक असून 23 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून सादर करावयाच्या आहेत. या स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील प्रत्येक महापालिका शाळेतून इयत्ता पहिली ते पाचवीचा प्राथमिक गट, इयत्ता सहावी ते आठवीचा उच्च प्राथमिक गट आणि इयत्ता नववीचा माध्यमिक गट अशा 3 गटांतून प्रत्येकी 3 अशाप्रकारे एकूण 9 सर्वोत्तम प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक शाळांतून निवडलेले हे 9 प्रकल्प अंतिम फेरीसाठी 24 फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालय स्तरावर पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी त्यांचे मूल्यमापन होऊन अंतिम विजेत्या प्रकल्पांची निवड केली जाणार आहे.
या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करताना प्लास्टिक कचरा, टाकाऊ लाकूड, काच, पेपर अथवा कार्डबोर्ड, ई वेस्ट अशा विविध स्वरुपातील कचरा म्हणून टाकून दिल्या जातील, अशा साहित्याचा वापर करून कल्पकतेने आकर्षक वस्तू तयार करणे अपेक्षित आहे.
नवी मुंबई महापालिका शाळांतील प्रत्येक मुलाने यामध्ये सहभागी होत सृजनशीलतेला मुक्त वाव द्यावा. तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षकांसह पालकांनी प्रोत्साहित करावे.
राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका