| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अदानी आणि मोदींच्या 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीवरुन प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात खासदारकी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पाहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.
देशात आज लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची उदाहरणं रोज बघायला मिळतात. मी संसदेत मोदी आणि अदानींच्या संबंधावर प्रश्न विचारले होते. त्याचे पुरावेदेखील सादर केले होते. अदानींच्या कंपनींमध्ये 20 हजार कोटी कोणी गुंतवले? असा थेट प्रश्न मी विचारला होता, त्यामुळे माझी खासदारकी रद्द करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच माझी खासदारकी रद्द झाली, तरी मी गप्प बसणार नाही. मी मोदी सरकारला प्रश्न विचारणं बंद करणार नाही, मी त्यांना घाबरत नाही, असेही ते म्हणाले.
देशाच्या लोकशाहीचं, देशातील संस्थांचं रक्षण करणे, देशातील गरीब लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं आणि पंतप्रधानांशी असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेणार्या अदानींसारख्या लोकांबद्दल सत्य बोलणं हे माझे काम आहे. मी मोदी सरकारच्या धमक्यांना आणि आरोपांना घाबरत नाही.
राहुल गांधी, काँग्रेस नेते
विधिमंडळात मूक आंदोलन
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून, अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात लोकशाहीची हत्या, असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.