। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासंदर्भात पंधरा हजारांची लाच घेणार्या मुरुडच्या लाचखोर तहसिलदार गमन गावीत याच्यासह शिपाई संदेश सदानंद वांळज, रेमनाथ शाम पाटील या दोन कर्मचार्यांना आज 13 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार यशवंत पाटील याला आपल्या जमीनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाटीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती. मात्र मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्या सांगण्याप्रमाणे शिपाई संदेश सदानंद वांळज याने त्यासाठी तक्रारदार यशवंत पाटीलकडे मुरुड तहसिलदार गमन गावीत यांनी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यशवंत पाटीलने थेट नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली. मागितलेल्या लाचेचनुसायानर या तक्रारीची खात्री करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान तक्रारदार यशवंत पाटीलकडून 15 हजार रुपयांची लाच तहसीलदार गमन गावित यांच्या सांगण्यावरून शिपाई रेमनाथ पाटील यास घेताना या पथकाने रंगेहाथ पकडले होते.या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार बी भिल्लारे यांनी 13 ऑगस्ट2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज परत हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी कोठडी सुनावली आहे.