| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी शहराजवळ आंबे काढताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे. राजू इलम असे या युवकाचे नाव असून, ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात काम करणारा हा तरुण आंब्याच्या हंगामात कोकणात आंबे काढण्याची कामे ही करायचा. शनिवारी (दि.5) शहराजवळ असलेल्या चंपक मैदानात आंबे काढत असताना लोखंडी आकडयाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील खेड तालुक्यात राजू इलम या कामगाराचा आंबे तोडताना विजेच्या तारेला धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजू इलम हा 30 वर्षांचा युवक शनिवारी शहरानजीक असलेल्या चंपक मैदानात आंबे काढत होता. पण आंबे काढत असताना जवळच असलेल्या विजेच्या तारेला घडाचा स्पर्श लागून त्याला जोराचा झटका बसला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हातावरती पोट असणारा राजू इलमहा एकुलता एक कमावता मुलगा होता .पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी तसेच आंब्याचा हंगामात आंबे काढण्याचे कामही तो करायचा. आंबे काढताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या झटक्याने तरुण खाली पडला, ही बाब आजूबाजूचा लोकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणाला दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणाला तपासात त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.