एक जण गंभीर जखमी
। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी (दि.13) सकाळी भीषण अपघात झाला. ग्रामीण भागातील रायते पुलावर ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड येथील काही नागरिक ईको कारमधून कल्याणकडे प्रवास करत होते. याच दरम्यान रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला या कारची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. यावेळी कारमध्ये बारा प्रवासी होते. त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गाडीत अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







