रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी।
तंत्रज्ञान ही काळाची गरज निर्माण झाली आहे. याचाच आधार घेत अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून घर बसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर आर्थिक देवाण घेवाण होणार आहेत. त्यात कागदविरहीत कार्यालय बनविले जाणार असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आदर्श भवन येथे गुरुवारी (दि.4) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक सतीश प्रधान, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, सुरेश गावंड, अॅड. रेश्मा पाटील, अॅड. वर्षा शेठ, सीए संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले हे संचालक यावेळी उपस्थित होते.
अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, 1998 पासून सुरु झाली. रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या सहा जिल्ह्यांमध्येे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. बँकीग क्षेत्रात दिवसेंदिवस अमुलाग्र बदल होत आहे. या अमुलाग्र बदलाचा स्विकार करीत अलिबागमधील आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून पतसंस्थेचे कामकाज अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एका क्लिकवर कर्ज
कर्ज मिळविण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. हा कालावधीत कमी करून एका क्लिकवर कर्जदाराला कर्ज मिळावे यासाठी डिजिटल पध्दतीने कामकाज केले जाणार आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर तयार केला असून या सॉफ्टवेअरमध्ये सर्व कागदपत्रांची माहिती अपलोड केली जाणार आहे. यातून कामकाज पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
आदर्श पतसंस्थेने मोबाईल अॅप तयार केला असून या अॅपला सुमारे साडेपाच हजार ग्राहक जोडले गेले आहेत. या अॅपच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज करणे व आरटीजीएस आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पतसंस्था भविष्यात फेसलेस बँकिंग प्रणालीचा अवलंब करणार आहे.
अभिजीत पाटील, अध्यक्ष
रौप्यमहात्सवी वर्षानिमित्त काही शाखांमध्ये नेत्रचिकित्सा शिबिरे आयोजित करण्यात आली होती. ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आढळून आले त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेला खर्च आदर्शतर्फे करण्यात आला. पाली तालुक्यातील आदिवासी शाळेला एक लाख रूपये मदत देण्यात आली. कुरुळ येथील आर.सी.एफ. वसाहतीमधील मतीमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्शतर्फे गणवेष वाटप करण्यात येणार आहे. 7 मे रोजी होणाऱ्या आदर्श संगीत संध्या कार्यक्रमात आदर्शतर्फे पोलीस कल्याण निधीसाठी 2 लाख 11 हजार 111 रूपये देण्यात येणार आहेत, तसेच संस्थेने अलिबाग मधील अनाथ व निराधार बालकांसाठी कार्यरत असलेली वात्सल्य ट्रस्ट या संस्थेला वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.
रौप्य महोत्सवी वर्षात सभासद व ग्राहकांसाठी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य तपासणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम केवळ मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अलिबागमध्येच आयोजित न करता संस्थेच्या सर्व शाखांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात सांगता समारंभ अलिबागमध्ये आयोजित केला जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.