अलिबाग समुद्रकिनाऱ्याला मिळणार सुरक्षाकवच

| रायगड | प्रतिनिधी |

उधाणाच्या उंच उंच लाटांमुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगतचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती आणि किनाऱ्यालगत संरक्षण भिंतीसाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मोठ्या दगडांपासून 400 मीटर लांबीचा धूप प्रतिबंधात्मक बंधारा पतन विभागाकडून बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच या बंधाऱ्याला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे. यापूर्वी बांधलेला गॅबियन पद्धतीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. अनेक ठिकाणी जाळीचे वेष्टन तुटल्याने बंधारा ठिकठिकाणी खचला आहे. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात अलिबाग कोळीवाडा परिसरात पाणी शिरून मोठे नुकसान होते. बंधाऱ्याची दुरुस्तीची मागणी कोळीवाड्यातील नागरिकांनी लावून धरली होती.

उधाणाचे पाणी मासळी सुकवण्याच्या खळ्यातही जात असल्याने मासळी सुकवण्याची कायम गैरसोय व्हायची. शिवाय कोळीवाड्यातील घरातही पाणी शिरल्याने घरे कमकुवत झाली आहेत. अलिबाग समुद्रकिनारीही उधाण लाटांमुळे बंधाऱ्याला मोठी भेग पडल्याने पर्यटकांचीही गैरसोय होत होती.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यासाठी वायशेत आणि मापगाव येथील दगडखाणीतून दगड आणले जाणार आहेत. मोठे दगड उधाणाच्या लाटांमध्येही तग धरू शकणारे आहेत. या बंधाऱ्याचा आराखडा पुणे येथील सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेकडून निश्चित करण्यात आला आहे.

सीआरझेडची परवानगी आल्याने बंधाऱ्याच्या कामातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. पूर्वीचे जाळीचे वेष्टन तुटल्याने वेष्टनातील लहान दगड उधाणाच्या लाटांमुळे बाहेर येऊ लागली आहेत. जाळीचा वापर पुन्हा न करता मोठे दगड वापरले जातील, ते उधाणाचे पाणी थोपवण्यास सक्षम आहेत.

कल्पेश सावंत, सहायक अभियंता, पतन विभाग, अलिबाग
Exit mobile version