ॲड. मानसी म्हात्रे, सुरेश घरत यांच्या मागणीची दखल; संपावर असलेल्या परिचारिका कामावर रुजू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा रुग्णालयातील परिचारिका गेल्या दोन दिवसांपासून संपावर होत्या. त्यामुळे रुग्णांना अतिताडीची सेवा मिळणे कठीण झाले होते. तसेच, अनेक शस्त्रक्रीया लांबणीवर गेल्या होत्या. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. ही बाब शेकापच्या महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे तसेच तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणली. यावेळी त्यांनी, अत्यावश्यक सेवेतील परिचारिकांना तात्काळ कामावर रूजू करून घ्या, अन्यथा नातेवाईकांसह शेकापतर्फे आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे शेकापच्या दणक्याने रुग्ण प्रशासन खडबडून जागे झाले असून, संपावर गेलेल्या परिचारिकांना तात्काळ कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले. शेकापच्या दणक्याने काही तासातच सायंकाळी परिचारिका कामावर रुजू झाल्या.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. शहरी भागासह ग्रामीण भागातील हजारो रुग्ण रुग्णालयात येऊन उपचार घेतात. जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षामध्ये सकाळी प्रचंड गर्दी होते. वेगवेगळ्या तपासणीसाठी रुग्ण रुग्णालयात येतात. मंगळवार (दि.21) पासून राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये महाराष्ट्र गर्व्हनमेंट नर्सेस फेडरेशननेदेखील सहभाग घेतला. परिचारिका कामावर नसल्याने रुग्ण सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अनेक तातडीच्या शस्त्रक्रीया लांबणीवर गेल्याने रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. कंत्राटी परिचारिकांच्या भरोवश्यावर जिल्हा रुग्णालयातील कारभार चालू होता. कंत्राटी परिचारिकांना 12-12 तास राबविले जात होते. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. रुग्ण प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
ही बाब शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे तसेच सुरेश घरत यांच्या लक्षात आली. त्यांनी गुरुवारी (दि.23) सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांची भेट घेतली. शेकापच्यावतीने तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला होता. शेकापच्या दणक्याने रुग्ण प्रशासन खडबडून जागे झाले आणि संपावर गेलेल्या परिचारिकांना तात्काळ कामावर रूज व्हा, अशी सुचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांनी केली. त्यानंतर काही तासातच परिचारिका सायंकाळी कामावर रूजू झाल्या.







