नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांमधून तीव्र नाराजी
| म्हसळा | वार्ताहर |
बर्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने म्हसळा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. तालुक्यात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे शहरातील विविध भागातील गटारे तुंबली असून, यामुळे ते पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे नागरिकांना या गटाराच्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत असून, त्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. नगरपंचायत प्रशासनाने तुंबलेली गटारे तात्काळ मोकळी करून रस्त्यावरून वाहणारे पाणी थांबवावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील जैन मंदिरासमोर गटारे तुंबली आहेत. यामुळे गटारातून वाहणारे पाणी थेट रस्त्यावरून दुकानात शिरल्याचा प्रकार शहरात दिसून येतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून काहीही हालचाली होत नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहन चालकांना, दुचाकीस्वारांना या घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे. वेगात आलेल्या वाहनाने पाण्यातून वाहन काढले तरी, इतरांच्या अंगावर घाणपाणी उडत आहे.
पावसापूर्वी लाखो रुपये खर्च करून गटारे साफ केली जातात. तरीही ही परिस्थिती का निर्माण होते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गुरव हॉटेल ते अलहमद हॉस्पिटल या भागात अनेक नागरिक राहतात, या भागातील नागरिकांनी गटाराची व्यवस्था व्हावी यासाठी नगरपंचायतीकडे अनेकवेळा गटाराची मागणी केली; परंतु नगरपंचायत नागरिकांच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.