मयार्देपेक्षा कमी वजनाची जबाबदारी खेळाडूची

विनेशची याचिका फेटाळल्याचे कारण क्रीडा लवादाकडून स्पष्ट

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना खेळाडूंनी त्यांच्या वजन मर्यादेपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यायला हवी. कोणत्याही परिस्थितीत कुणी याला अपवाद ठरु शकत नाही, अशा शब्दात क्रीडा लवादाने भारताच्या विनेश फोगटची याचिका फेटाळण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसर्‍या दिवशी वजनाच्या बाबतीत असा परिणाम आला तर, तो कठोर मानायला हवा, असेही लवादाने म्हटले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो वजन गटातून खेळताना विनेशने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजनात शंभर ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला अंतिम फेरीसाठी अपात्र धरण्यात आले होते. या निर्णयाविरोधात विनेशने ऑलिम्पिकसाठी नियुक्त केलेल्या हंगामी क्रीडा लवाद समितीकडे याचिका दाखल केली होती. तीनवेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर क्रीडा लवादाने विनेशची याचिका फेटळाल्याचे जाहीर केले. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. क्रीडा लवादाने विनेशचे अपील का फेटाळण्यात आले या संदर्भातील निर्णय प्रकाशित केला. संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या (युडब्ल्यूडब्ल्यू) नियमानुसार जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत दोन्ही दिवशी वजन अनिवार्य असते. दुसर्‍या दिवशी खेळाडू माघार घेणार असला, तरी त्याला वजन द्यावेच लागते. मानांकन स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन किलो वजनाचा फरक मान्य केला जातो. पण, जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत असे करता येत नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वीच विनेश अपात्र ठरली. अव्वल मानांकित युई सुसाकीवर मात केल्यावर तर विनेशलाच संभाव्य विजेती म्हणून गणले जात होते.

क्रीडा लवादाचे निष्कर्ष
विनेशने स्वेच्छेने 50 किलो वजन गट निवडला.
50 किलोपेक्षा वजन कमी राखणे हे विनेशला ठाऊक होते.
विनेश अनुभवी कुस्तीगीर आहे. यापूर्वी या नियमातंर्गत विविध स्पर्धा खेळली आहे.
विनेशला नियमाची पुर्णपणे कल्पना होती.
खेळाडूला एकाच वजनी गटात सहभाग घेता येतो.
वजन कमी राखण्याची जबाबदारी विनेशचीच राहते.
Exit mobile version